मुंबई : पाकिस्तान- बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेकडून मुंबईत ९ फेब्रुवारी मोर्चोचे आयोजन करण्यात आले आहेत. मात्र, ही शिवसेनेची जुनीच भूमिका असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मुलाखतीत स्पष्ट केलंय.
घुसखोरांना हाकलून देण्यासाठी मनसे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत मोर्चा काढणार आहे. त्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मनसेचं नाव न घेता डिवचले. घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांनी आधीच ठामपणे मांडली आहे. ही नवीन भूमिका नाही. पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलावं लागेल. कोणी अडवलंय तुम्हाला असाही सवालही उध्दव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मनसे ९ फेब्रुवारीला पाकिस्तानी- बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी मोर्चा काढणार आहे. याची जय्यत तयारी सुरु केली आहे. ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मनसेनं महाअधिवेशनात याबत घोषणा केली होती. मनसे शिवसेनेचा हा मुद्दा हायजॅक करत आहेत. असाच सूर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मुलाखतीत उमटला. त्यामुळे भविष्यात मनसे विरुध्द शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे.