मुंबई: माजी महिला-बाल कल्याण, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे परळी मतदारसंघातून पराभव नंतर पुन्हा पुनर्वसनासाठी पक्षावर दबातंत्र टाकत आहेत. त्यामुळे त्यांनी फेसबुक पोस्ट आणि ट्विटरवरील भाजपचा उल्लेख टाळल्यामुळे चर्चेंना उधाण आलं आहे. यावर खुलासा करतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, पंकजा मुंडे भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात. असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. यानंतर पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरुन आपली भाजपासंदर्भातली ओळखही काढून टाकली. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा सुरु झाली होती.
याविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजा मुंडे या भाजपाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांचं पंकजा मुंडेंशी बोलणं झालं असून, त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात. असंही पाटील म्हणाले.
कोणताही राजकीय नेता असो पराभवानंतर तो आपल्या पराभवाचं विश्लेषण करत असतो. असं का झालं याबद्दल तो आत्मचिंतन करत असतो. १२ तारखेला गोपीनाथ गडावर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. यासाठी राज्यभरातील त्यांचे अनेक नेते गोपीनाथगडावर येतात. आम्हीही या कार्यक्रमाला जातो. त्यामुळे पंकजा वेगळा विचार करत आहेत असा अर्थ काढणं चुकीचं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.