Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईNRC : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोटारडेपणा उघड - सचिन सावंत

NRC : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोटारडेपणा उघड – सचिन सावंत

Sachin Sawant Narendra Modi,Sachin, Sawant, Narendra, Modiमुंबई : पंतप्रधानांबद्दलचा आदर वाढवण्याचे काम देशाचे प्रत्येक पंतप्रधानांनी आपल्या आचरणाने केले आहे, दुर्दैवाने गेल्या सहा वर्षात देशात ही परंपरा कायम राहिलेली दिसत नाही. भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलतात असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बंदी छावण्याबाबतचा (Detention Centre) खोटेपणा कागदपत्रासह उघड करताना म्हटले आहे.

पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, राजन भोसले उपस्थित होते. यावेळी सावंत म्हणाले की, पंतप्रधानांचे आचरण पाहता या देशातील बहुतांश लोकांची अवस्था ही सिंहासन मधल्या दिगू टिपणीस यांच्यासारखी होईल असा टोलाही सावंत यांनी लगावला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात २०१४ ते २०१९ या सालापर्यंत मोदी सरकारमध्ये कोणत्याही स्तरावर NRC आणि (Detention Centre)बंदी छावण्याबाबत चर्चा झाली नाही असे अत्यंत खोटे विधान केले होते. या संदर्भात राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्य व केंद्र शासित प्रदेशामध्ये बंदी छावण्या उभारण्यासंदर्भात योजना होती हे सावंत यांनी कागदपत्रासह उघड केले. ९ जानेवारी २०१९ रोजी केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग आणि प्रधान सचिव गृह विभाग यांना पाठवलेल्या पत्रानुसार बंदी छावण्यासंदर्भात ९-१० सप्टेंबर २०१४ आणि ७ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारला पत्र पाठवण्यात आले होते.

या बंदी छावण्यांचा आराखड्याचा मसुदा तयार करण्यासंदर्भात ३० ऑक्टबर २०१८ रोजी सर्व राज्यांच्या व केंद्र शासित सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी केंद्रीय अधिकाऱ्यांनी चर्चा करुन त्यांचे मत अजमावले होते. या सर्व प्रतिनिधींनी दिलेल्या अभिप्रायानंतर केंद्रीय गृह विभागाने बंदी छावण्यांचा आराखड्याचा मसुदा अंतिम करुन ९ जानेवारी २०१९ च्या पत्रासोबत सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठवला. देशातील सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशात बंदी छावण्या निर्माण करणे हे केंद्र सरकारला अभिप्रेत होते हे स्पष्ट आहे. यानंतर १६ ऑगस्ट २०१६ चे राज्याच्या गृहविभागाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवलेले पत्र दाखवून सावंत म्हणाले ही, या पत्रानुसार केंद्र सरकारच्या ९ जानेवारी २०१९ च्या आदेशाने राज्याच्या गृहविभागाने सिडकोकडे तात्पुरती बंदी छावणी उभारण्याकरता प्लॉट क्रमांक १४ सेक्टर क्रमांक ५ नेरुळ येथे जागा मागितली होती तसेच कायमस्वरुपी बंदी छावणी उभारण्यासाठी सिडकोकडे ३ एकर जागा नवी मुंबईत उपलब्ध करण्यास सांगितले होते. याबरोबरच बंगरुळू येथे बंदी छावणी तयार झालेली आहे हे स्पष्ट दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या ९ महिन्यांपासून देशात प्रथम नागरिकता संशोधन कायदा येईल आणि नंतर देशपातळीवर NRC लागू करण्यात येईल असे म्हटले होते. तसेच जाहीरपणे संसदेतही सांगितले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही केंद्र सरकारच्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर एनआरसी आणणे अंतर्भूत आहे. असे म्हटले असतानाही पंतप्रधान खोटे सांगत आहेत. काँग्रेस पक्षाने जाहिर केलेल्या कागदपत्रानुसार वेगवेगळ्या स्तरावर सातत्यपूर्ण बंदी छावण्याबाबत केंद्र सरकारकडून चर्चा झालेली आहे स्पष्ट आहे. म्हणूनच दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्यांचा विश्वासघात करत आहेत आणि खोटे बोलत आहेत, असे सावंत यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments