मुंबई : राज्यात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी आहे. मात्र मुंबई महापालिकेतील मानखुर्दमधील पोटनिवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. राष्ट्रवादीचा शिवसेना उमेदवाराला पाठिंबा आहे. तर शिवसेनेचा जुना मित्रपक्ष भाजपही मैदानात असल्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे. आज गुरुवारी मतदान होत असून १० जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
प्रभाग क्रमांक १४१ मधील पोटनिवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारराजा मतदान करण्यासाठी घराबाहेर पडला आहे. शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे, भाजपकडून दिनेश (बबलू) पांचाळ तर काँग्रेसकडून अल्ताफ काझी रिंगणात आहेत. एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पक्षाचे जमीर खान या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. एकूण १८ उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.
मानखुर्द प्रभागात एकूण ३२ हजार मतदार असून काहींची नावे मतदार यादीत आलेली नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विठ्ठल लोकरे हे आधी काँग्रेसमध्ये होते. विधानसभा निवडणुकीत ते अबू आझमींविरोधात उभे होते. पराभव झाल्यानंतर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि ते शिसेनेत गेले. मानखुर्द प्रभाग क्रमांक १४१ च्या पोटनिवडणुकीत आता ते पुन्हा नशीब आजमावत आहेत.
एकीकडे महाविकास आघाडी असून दुसरीकडे याच भागात काँग्रेसचे उमेदवार अल्ताफ काझीही उभे आहेत. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे. मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपला कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुरुष मतदार : १८ हजार ५४
महिला मतदार : १४ हजार ३२
एकूण ३२ हजार ९६
निवडणुकीसाठी २८ केंद्र
केंद्र क्र. १०मध्ये सर्वांत कमी; ५१६ मतदार
केंद्र क्र. १८ मध्ये सर्वांत जास्त; १३९८ मतदार