मुंबई : ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपचा कमळ हातात घेतलं. त्यामुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार धोक्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं. महाराष्ट्रातील सरकारची स्थिती उत्तम आहे. महाराष्ट्रात मध्यप्रदेशसारखी स्थिती ओढवणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
शरद पवार यांनी आज विधानभवनात येऊन राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर यांनी प्रसारमाध्यमांशी वेगवेळ्या विषयांवर मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे सक्षम आहेत. त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. मात्र, मध्यप्रदेश सरकारबाबत साशंकता आहे. कमलनाथ काही करतील का? हे पाहावं लागेल, असं सांगतानाच काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच काँग्रेसमध्ये नेतृत्व, कर्तृत्व आणि भविष्यही असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
राज्य सरकारला शंभर टक्के गुण…
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या सरकारला तुम्ही किती मार्क द्याल? असा सवाल त्यांना करण्यात आला. तेव्हा राज्य सरकारला शंभर टक्के गुण देईन, असं पवार म्हणाले. हे तीन पक्षाचं सरकार आहे आणि शंभर दिवस चाललं. त्यामुळेच या सरकारला शंभर टक्के गुण देईल, असं पवारांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवरही प्रतिक्रिया दिली. सरकारव लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केली असेल तर त्याचं स्वागतच आहे. त्यांनी चांगलं काही तरी केलं पाहिजे. लोकांसमोर चांगलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.