मुंबई : भाजप जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी जळगाव न्यायालयाने दमानियांना समन्स जारी केलं आहे. दमानियांना मंगळवार (२३ जानेवारी) रोजी स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण…
अंजली दमानिया यांनी खडसेंविरोधात भोसरीत जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यावेळचं हे प्रकरण आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर ५२ मधील तीन एकर जागेचा वाद आहे. ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तींकडून, तीन कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली.
पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करुन स्टँप ड्युटी म्हणून १ कोटी ३७ लाख रुपये देखील भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं. या सर्व प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.
दरम्यान, मे २०१८ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचं नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला होता.
याच प्रकरणी एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांनी निराधार आरोप करत आपली बदनामी केल्याचं म्हणत दमानिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणामुळे दमानिया आणि खडसे वाद रंगण्याची शक्यता आहे.