मुंबई : इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या सीझनवर करोनाचं सावट आहे. येत्या २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेला याचा फटका बसणार आहे. कारण, राज्य सरकारकडून महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या तिकीटांवर बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. यावर राज्य सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर शुभारंभाचा सामना होणार आहे.
जगातील सर्वात मोठी क्रिकेटची T20 लीग असणाऱ्या आयपीएल स्पर्धेदरम्यान, करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच राज्य सरकारकडून तिकीट विक्रीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रेक्षकांविना आम्ही सामने खेळवू शकतो अशी अधिकृत सूचना आयपीएलकडून अद्याप आली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
करोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने बंगळूरूमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जावेत किंवा नाही याबाबत पत्राद्वारे केंद्र सरकारचा सल्ला घेतला आहे. याबाबत कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, शेजारचे राज्य महाराष्ट्राने देखील याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर केंद्राच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत.