मुंबई : जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. अर्थमंत्र्यांच्या या घोषणे नंतर शेअर बाजारता मोठी उसळी पाहायला मिळाली.
आयकर परतावा भरण्यासाठी मुदत वाढीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. 30 जूनपर्यंत प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. 2018-19 वर्षाकरता ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच उशीरा आयकर भरणाऱ्यांना 12 टक्केऐवजी 9 टक्के दंड आकारला जाणार आहे. याशिवाय मार्च, एप्रिल, मे महिन्याचा जीएसटी रिटर्न भरण्यासाठी मुदतही वाढवून 30 जून करण्यात आली आहे. ‘विवाद से विश्वास’ या योजनेलाही 30 जूनपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. यामध्ये 31 मार्चपासून 30 जूनपर्यंत कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही 30 जूनपर्यंत वाढवल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.