नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायदा हा घटना बाह्य आहे. या कायद्याला नागपूर हिवाळी अधिवेशनात काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. हा कायदा मुस्लिमविरोधी आहे. महाराष्ट्रामध्ये शांती हवी असेल तर कायदा लागू करू नका. देशात आणि महाराष्ट्र मध्ये असंतोष सुरू आहे. जनतेचा आवाज दडपला जात आहे. या कायद्याची अंमलबजावणी करू नका,’ अशी मागणी काँग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
या कायद्याविरोधात देशभरात जाळपोळ, दगडफेक, निदर्शने होत आहेत. काही ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली आहे. ईशान्य भारतात या कायद्याविरोधात आंदोलन चांगलेच पेटले आहे. दिल्ली, मुंबई, बंगळूरु, लखनऊ, कोलकाता, औरंगाबाद सह ठिकठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. बॉलीवूड कलाकारांनीही यामध्ये उडी घेतली आहे. सरकार विरोधात वातावरण चांगलेच चिघळले असल्यामुळे विदेशातील माध्यमांनीही याची दखल घेतली आहे. त्यामुळे या कायद्याची चांगलीच चर्चा होत आहे.
विद्यार्थ्यानंतर आता राजकीय पक्षांनीही आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेससहीत 15 राजकीय पक्षांनी काल या कायद्याविरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं. सरकारनं दोन पाऊलं मागे येत हा कायदा परत घ्यावा अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली. बॉलिवूड कलाकारांनीही यामध्ये उडी घेतली आहे. मोदी सरकार देशातल्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून मुस्कटदाबी करत असल्याचा गंभीर आरोपही सोनिया गांधी यांनी मंगळवारी केला आहे.