औरंगाबाद : मी ठाकरे सरकारविरोधात एक अवाक्षरही काढलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्या उपोषणाकडे सकारात्मक लक्ष देतील, असा विश्वास भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. पण पुढे काम केलं नाही, तर विचार करावा लागेल. असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज सोमवार (२७ जानेवारी ) उपोषणाला बसल्या आहेत.
पंकजा मुंडे म्हणाल्या, उपोषणानंतर मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तसेच मराठवाड्यासंदर्भात कॅबिनेट बैठक घ्यावी, अशी विनंती करणार असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी दिली. ‘हे लाक्षणिक उपोषण आहे. लाखोच्या संख्येने लोक येतात, विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे. पाणी हे माझ्यासाठी मिशन आहे, पॅशन आहे. पाणी गरजेचं आहे. मराठवाड्याला उद्योग आणि शेतीसाठी पाण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पाऊस हा मराठवाड्यावर रुसलेला आहे. हा कित्येक वर्षांचा प्रश्न आहे. जलयुक्त शिवारचं यश आहे, परंतु पाऊस न पडल्यामुळे जलयुक्तवर टीका करणं योग्य नाही. मला कोणतंही पद मिळावं, यासाठी कोणापुढे हात जोडले नाही किंवा पुढे केलेले नाही, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या योजनेची अंमलबजावणी करणे, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन, पिण्याचे पाणी या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे उपोषण करत आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार हरिभाऊ बागडे हे नेतेही उपोषणात सहभागी झाले होते.