मुंबई : मनसेला अपयश आल्यामुळे मनसे आपल्या भूमिकेत बदल करणार आहे. त्यामुळे १४ वर्षानंतर मनसे पक्षाचा झेंडा बदलणार आहे. पक्षाचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार आहे. परंतु मनसेला झेंडा बदलून यश मिळेल का? अशी चर्चा सुरु आहे. उदया गुरुवारी (२३ जानेवारी) पक्षाच्या महाअधिवेशनात नवीन झेंड्या बाबत भूमिका स्पष्ट होणार आहे.
महाअधिवेशनात मनसे वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मनसेची ९ मार्च २००६ मध्ये स्थापना झाली. परंतु २००९ मध्ये मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. तो अपवाद सोडून मनसेला अद्यापही यश मिळाले नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही मोठे बदल करणार असून पक्षाचा झेंडाही बदलणार असल्याचं बोललं जात आहे. पक्षाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडीवरुन तसे संकेत मिळत आहे. मनसेच्या नव्या झेंड्यात फक्त भगवा रंग असणार असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार असल्याचं कळत आहे. या झेंड्याचा फोटोही समोर आला आहे. मात्र पक्षाने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
झेंडे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले…
मनसेकडून दोन झेंडे तयार करण्यात आल्याचं समजत आहे. हे दोन्ही प्रस्तावित झेंडे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत. एका झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असून दुसऱ्यावर निवडणूक चिन्ह इंजिन असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या दोन्ही झेंड्यांवर भगवा रंग कायम असणार असल्याचं सांगितलं जात आहे. मनसेच्या सध्याच्या झेंड्यात भगवा, निळा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
महाअधिवेशनात अनेक राजकीय ठराव संमत केले जाणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
ट्विटर हँडलवरुन हटवला झेंडा…
मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसत आहे. त्यामुळे निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बदलणार हे निश्चित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष मनसेच्या झेंड्याकडे लागले आहे.
मराठी मुद्यानंतर अपयश आल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यांकडे वाटचाल…
मनसेची १४ वर्षापूर्वी स्थापना झाल्यानंतर परप्रांतीयांना मारहाण करण्यात आली होती. मराठी मुद्दा आणि मराठी पाट्यांवरून राजकारण केले. त्यानंतरही अपयश आले. २००९ चा अपवाद सोडता मनसेला अद्यापही यश मिळाले नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा मनसेचा विचार आहे.