मुंबई : शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेऊन सत्तास्थापन केली. परंतु त्या धक्क्यातून भाजप अद्यापही बाहेर पडल्याचे दिसून येत नाही. जनतेने आम्हाला जनमत दिलं होतं, मात्र शिवसेनेने बेईमानी केली अशी टीका माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पालघरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्यात आज बुधवारी केली.
सत्तेसाठी शिवसेना या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात रान पेटवलं, कायम त्यांच्यावर टीका केली. त्या बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्द दिला होता का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला.
फडणवीस यावेळी म्हणाले, तीन विद्यार्थी एकत्र आले त्यामुळे त्यांचे गुण जास्त झाले. मेरीटमध्ये वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं. अशीही टीका फडणवीस यांनी केली. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करु, विनाअट कर्जमाफी अशा घोषणा तर देण्यात आल्या होत्या मात्र त्या घोषणा हवेत विरल्या. सत्तेवर असलेल्या तीन पक्षांनी फक्त जनादेशाशी प्रतारणा केली नाही तर शेतकऱ्यांशी आणि जनतेशी प्रतारणा केली” अशीही टीका फडणवीस यांनी केली.