मुंबई : माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये इंडियाबूल्स येथे दीडतास गुप्त बैठक झाली. हे वृत्त एका वृत्तवाहिनीवर झळकले. यामुळे मनसे आणि भाजप युती होणार या चर्चेला उधाण आलं आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करुन सत्ता स्थापन केली त्यामुळे सर्व समिकरणे बदलली. आता भाजप नवीन भिडूच्या शोधात असल्यामुळे मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे. सोमवारीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते. राजकारणात कुणीही कोणाचा कायम शत्रू नसतो असं विधान केलं होतं. २३ जानेवारी रोजी मनसे मेळाव्यामध्ये आपली भूमिका मांडणार आहे. त्यापूर्वी भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता आहे.
मनसेने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका केली होती. हा जनतेचा विश्वास घात आहे. मतदारांचा अपमान करण्यात आल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेंची ईडी मार्फत चौकशी केली होती. त्या दृष्टीकोनातूनही चर्चा झाली असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मनसेला सोबत घेऊन भाजप मराठी मतदारांना आपल्या पारड्यात पाडून घेण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातून मनसे आणि भाजपचा एकत्र येण्याची शक्यता आहे.