नवी दिल्ली : विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री फडणवीसांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. यामुळे फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.
गुन्ह्यांची माहिती लपवली होती…
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप आहे. यापूर्वी नागपूर न्यायालयाने फडणवीसांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. नागपुरातील २ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. यातील एक मानहानीचा खटला आणि दुसरा फसवणुकीचा खटला आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने याबाबत फडणवीसांना समन्स बजावला होता.
वकिलाच्या सांगण्यावरून ही माहिती दिली नव्हती...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन खासगी तक्रारी माझ्याविरुद्ध करण्यात आल्या होत्या. यात माझ्यावर वैयक्तिक आरोप नाहीत. या सगळ्या आंदोलनाच्या केसेस आहेत. एक केस १९९५-९८ ची आहे. सर्व केसेस या लोकांच्या संघर्षासाठी आहेत.
मी कोर्टात माझी बाजू मांडली आहे. मला कोर्टाकडून न्याय मिळेल. या सगळ्यामागे कोण आहे हे चांगलंच माहित आहे. झोपडपट्टी हटाव मोहिमे विरुद्ध आंदोलन करताना हे गुन्हे लावण्यात आले होते. निवडणुकीच्या काळात इतर सर्व गुन्ह्यांची माहिती दिली होती. फक्त वकिलाच्या सांगण्यावरून ही माहिती दिली नव्हती. त्यात लपविण्यासारखं काहीही नाही. कोर्टात सगळं सिद्ध होईल.