मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम १४४ नंतर महाराष्ट्रात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
आज सकाळी मुंबई आणि पुण्यातील अनेक जण कामकाजासाठी बाहेर पडलेले पाहायला मिळाले. अशात राज्यात संचारबंदी लागू करण्यात यावी अशी सातत्याने मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :
- चार ते पाच लोकांपेक्षा अधिक लोकं एकत्र येता कामा नये. आंतरराज्य जिल्हा सीमा बंद.
- आंतरराज्य वाहतूक देखील बंद करण्यात आळिते.
- देशातंर्गत विमानसेवा बंद करण्याची पंतप्रधानाकडे मागणी केली आहे.
- जीवनावश्यक वस्तू, मेडिकल, बेकरी, पशूखाद्य, दवाखाने उघडे राहतील.
- कृषीउद्योग, खतांची कारखाने आणि त्यांची वाहतूक सुरू राहतील.
- सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद राहणार, यामध्ये पुजाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही परवानगी नाही.
- बस या अत्यावश्यक सेवांसाठी वापरल्या जातील.
- खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवेसाठी वापरता येणार.
- अंगणवाडी सेविका आणि होमगार्डना ट्रेनिंग देवून आवश्यक सेवेसाठी वापरले जाऊ शकतो.
- संशयित रूग्णांमुळे प्रादुर्भाव होण्याची भिती आहे. त्यामुळे क्वारंटाईन व्यक्तींनी काळजी घ्यावी.
- खासगी वाहनं देखील रस्त्यावर धावणार नाहीत.
- अत्यावश्यक कारणासाठीच रिक्षा किंवा टॅक्सी वापरात येईल.
- यामध्ये चालक + १ व्यक्ती हे रिक्षेतून तर चालक + २ असे टॅक्सीमधून प्रवास करू शकणार आहेत.
जिल्ह्यांतर्गत सीमा देखील सील
महाराष्ट्र राज्यात आजपासून जिल्ह्यांतर्गत सीमा देखील सील करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आपण कोरोना वायरस सोबतच्या लढ्यात निर्णयाक टप्प्यावर आहोत. आता थांबवता आले नाही तर जगभराप्रमाणे भारतातही कोरोना थैमान घालेल. संयम आणि निश्चिय पाळा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.