मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळांना दिला.
राज्यातील मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारीसह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी गृह मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, अब्दुल सत्तार, अबू आझमी, माजी मंत्री नवाब मलिक, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे, मुस्लिम समाजाचे धर्मगुरु उपस्थित होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत कोणताही गैरसमज मनात बाळगू नका, कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही… pic.twitter.com/0iNZB4Mndc
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2019
“राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्स-एनआरसी) निर्णय झाला नाही, याची खात्री केली असून असा कायदा जर कधी आलाच तर तो केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्व धर्मीयांसाठी असेल”, असं मुख्यमंत्री म्हणाले. “नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ‘एनआरसी’नुसार राज्यात एकही डिटेंशन कॅम्प होणार नाही. डिटेंशन कॅम्पबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. भारतात अंमली पदार्थ किंवा अन्य स्वरूपांच्या गुन्हेगारीच्या कारणामुळे शिक्षा भोगलेल्या परदेशी नागरिकांसाठीची ही व्यवस्था आहे.
या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठीची कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर मायदेशात परत पाठविण्यापर्यंत जो कालावधी लागतो त्या दरम्यानच्या कालावधीत तेथे ठेवण्यात येते. त्यामुळे डिटेंशन कॅम्पबाबत गैरसमज करुन भिती बाळगू नये”, असे आवाहनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केले.
राज्यातील व मुंबईतील मुस्लीम समाजबांधवांच्या शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट.गृहमंत्री एकनाथ शिंदे,उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल,अब्दुल सत्तार,अबू आझमी,नवाब मलिक,पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल,पोलिस आयुक्त संजय बर्वे,मुस्लिम समाज धर्मगुरू उपस्थित pic.twitter.com/BfCiBAuumv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 23, 2019
“नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत देशात अशांतता, भीती आणि गैरसमजाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरात या कायद्याविरोधात आंदोलने होत असून आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार होत आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण होत आहे. पण अशा वेळी आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राची शांततेची परंपरा जपत राज्याच्या लौकिकास धक्का लागू नये यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कोणाचाही हक्क हिरावला जाणार नाही यासाठी शासन खंबीरपणे जनतेच्या पाठिशी आहे”, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिला.