अभिनेत्री विद्या बालन आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करतेयं. १ जानेवारी १९७९ रोजी जन्मलेल्या विद्याचा बॉलिवूड प्रवास अतिशय संघर्षमय राहिला. ‘हम पांच’ या मालिकेत दिसलेली ही मुलगी एकदिवस बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या रांगेत जावून बसेल, असा कुणी विचारही केला नव्हता. पण ही ओळख मिळवणे विद्यासाठी इतके सोपे नव्हतेच. यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला.
साधी-सरळ, सुंदर अशी ओळख असलेल्या विद्याने माधुरी दीक्षितला ‘एक दो तीन’ या गाण्यात नाचताना बघितले आणि ती बॉलिवूडच्या प्रेमात पडली. विद्या त्यावेळी उणीपुरी सातवीत होती. याचदरम्यान विद्याने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनण्याचे ठरवले. एका मुलाखतीत विद्या तिच्या बॉलिवूडमधील संघर्षाबद्दल बोलली होती. मी बॉलिवूडमध्ये संघर्ष करत असताना मला साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत मल्याळम चित्रपट मिळाला होता. पण तो चित्रपट काही कारणाने बंद पडला आणि तेव्हापासून मला ‘अनलकी’ मानले जावू लागले. याच कारणाने एका साऊथ दिग्दर्शकाने मला भूमिका देण्यापूर्वी माझी जन्मपत्रिकामागितली होती, असे विद्याने या मुलाखतीत सांगितले होते. अनेकांना वाचून आश्चर्य वाटेल पण विद्याला एकापाठोपाठ एक अशा १२ चित्रपटांतून काढून टाकले गेले होते. अनेक नकार ऐकल्यानंतर एका दिग्दर्शकाने तर विद्याला कुरूप म्हणून हिणवले होते. त्या दिग्दर्शकाचे शब्द ऐकून विद्या पूर्णपणे खचून गेली होती. पण यातून ती धैर्याने बाहेर पडली. विद्याने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. यापैकी अनेक जाहिराती प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केल्या होत्या. २००३ मध्ये विद्याने ‘भालो थेको’ हा बंगाली चित्रपट साईन केला.
‘परिणीता’ हा विद्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट. या चित्रपटाने विद्याला पहिला ब्रेक दिला आणि या पहिल्या संधीचे विद्यानेही सोने केले. यानंतरच्या काळात विद्याने हिंदी चित्रपटसृष्टीत हिरोईन या शब्दाची व्याख्याच बदलवून टाकली. हिराईनच्या एकटीच्या बळावर चित्रपट हिट होऊ शकतो, हे विद्याने सिद्ध करून दाखवले.
‘डर्टी पिक्चर’, ‘नो वन किल्ड जेसिका’ आणि ‘कहानी’ या चित्रपटांनी विद्याला एक नवी ओळख दिली. २०१२ मध्ये विद्याने प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ राय कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतरही तिचे काही चित्रपट आले. हे चित्रपट फार कमाल दाखवू शकले नाहीत. पण आता विद्या अपयश या शब्दाच्या बरीच पलीकडे निघून गेलीय.