ठाणे दि. 12 (प्रतिनिधी) : आज भारतातील तरुणाई मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापरच आहे. मात्र केवळ करमणूक म्हणून सोशल मीडियाचा वापर करू नका तर समाजात प्रभावशाली व्यक्ती बनण्यासाठी याचा वापर करा तसेच स्वतःचा ब्रँड तयार करा असा संदेश गायक, संगीतकार पलाश सेन यांनी दिला. मीडियाचा वापर आणि त्याद्वारे समाजात प्रभावी ओळख कशी निर्माण करायची याबाबत आज महाराष्ट्रातील पहिले शिखर संमेलन हजारो तरुणांच्या उपस्थितीत पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एनई लिफ्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अजय कुडवा रिलायन्सचे मीडिया-डायरेक्टर उमेश उपाध्याय यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विविध सत्र, पॅनेल चर्चा, शिखर परिषदेमध्ये व्हिडिओ मार्केटींग, विपणन, सोशल मीडियामधील घडामोडी, सोशल मीडियाचा व्यवसायासाठी वापर अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चासत्र झाले. या कार्यक्रमात युफोरिया फेम पलाश सेन, अभिनेत्री रुचिरा जाधव, नम्रता प्रधान (छत्रीवाली मधील मधुरा), अभिजीत श्वेतचंद्र (बाजी), डिनो जेम्स, निता शिलीमकर आणि एजे (ओये इट) यांच्यासह अनेक नामांकित कलाकारांचा सहभाग होता. सोशल मीडिया व्यासपीठाचा वापर रोजगार निर्मितीसाठी कसा करता येईल यावर अनेक तज्ज्ञांनी या शिखर संमेलनात मार्गदर्शन केले. तसेच यू ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, यावर वावरताना तुम्ही अधिक लोकांपर्यंत कसे पोहचू शकणार तसेच त्यासाठी प्रभावी मजकूर कसा तयार करावा याबाबत या संमेलनात चर्चासत्र झाले.
व्हॉट्स ऍप चे ३०० दशलक्ष पेक्षा अधिक वापरकर्ते
नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, जगभरात इन्स्टाग्रामवर 1 अब्ज पेक्षा अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत, तर त्याची मूळ कंपनी फेसबुकवर दरमहा 2.38 अब्ज सक्रिय वापरकर्ते आहेत आणि दररोज १ कोटी दशलक्षाहूनही लोक ट्विटरवर लॉग इन करतात. व्हॉट्सअॅप हे आणखी एक शक्तिशाली व्यासपीठ आहे ज्याचे आपल्या देशात 300 दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. यू ट्यूबसाठी 265 दशलक्षाहून अधिक मासिक सक्रिय वापरकर्त्यांसह भारत जगातील सर्वात मोठा आणि वेगवान वाढणारा प्रेक्षक देखील आहे त्यामुळे येत्या काळात सोशल मीडियाचा वापर करून नवीन व्यासपीठ निर्माण करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे असाही सूर या संमेलनात निघाला.