बॉलिवूडमध्ये नाव कमावण्याचं स्वप्न घेऊन मायानगरी मुंबईत अनेक कलाकार दाखल होतात. मोजकेच कलाकार असतात जे या चंदेरी दुनियेत यशस्वी ठरतात.या चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यापैकी अभिनेत्रींसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं सौंदर्य.अभिनयात कमी जास्त असलं तरी वेळ मारुन नेली जाते मात्र अभिनेत्रींच्या सौंदर्यामुळेच आज बरेच सिनेमाचं बॉक्स ऑफिसवरील भवितव्य ठरतं.बॉलिवूडला सुरुवातीपासूनच सौंदर्यवती आणि देखण्या अभिनेत्रींची परंपरा लाभली आहे. या अभिनेत्रींनी आपल्या आरस्पानी सौंदर्यानं रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं आहे. बॉलिवूडच्या अशा अगणित सौंदर्यवती अभिनेत्रींमध्ये एक अशी अभिनेत्री होती जिनं आपल्या सौंदर्यानं रसिकांवर जादू केली.
रसिक तिच्या सौंदर्यावर फिदा झाले होते. मात्र तिचं हेच सौंदर्य तिच्या यशस्वी करिअरच्या आड आलं. या सौंदर्यामुळे तिला बॉलिवूडला पर्यायाने आपल्या यशस्वी करियरला रामराम करावा लागला. इतकंच नाही तर तिच्यावर देश सोडण्याची वेळ आली. या अभिनेत्रीचं नाव जॅस्मिन असे आहे. नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर गाजलेला ‘वीराना’ हा सिनेमा अनेकांनी पाहिलाच असेल. या सिनेमातील प्रमुख अभिनेत्री तुम्हाला नक्कीच भावली असणार. ही सौंदर्यवती आणि देखणी अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून जॅस्मिन होती. जॅस्मिननं १९७९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. ‘वीराना’ या सिनेमासोबतच जॅस्मिननं ‘बंद दरवाजा’, ‘पुरानी हवेली’, ‘डाक बंगला’ अशा सिनेमातही भूमिका साकारल्या होत्या. वीराना या सिनेमातील जॅस्मिनचं सौंदर्य पाहून रसिक तर फिदा झालेच होते. मात्र त्यावेळी बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचाही दबदबा होता असं म्हटलं जातं. जॅस्मिनचं सौंदर्य पाहून त्यावेळी तिला थेट अंडरवर्ल्डमधून फोन येऊ लागले.वारंवार अंडरवर्ल्डकडून येणा-या फोन कॉल्सला कंटाळून १९८८ साली जॅस्मिननं आपलं करिअर अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.बॉलिवूडला बाय बाय करत तिने भारत सोडण्याचा निर्णय घेतला.भारतातून जॅस्मिन अमेरिकेत स्थायिक झाल्याचं सांगण्यात येतं.अभिनयाचं करियर सोडल्यानंतर जॅस्मिन अमेरिकेतच विवाहबंधनात अडकल्याचं सांगण्यात येतं.मात्र सध्या जॅस्मिन काय करते, ती कुठे आहे याची कुणालाच माहिती नाही.