चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला भारत गणेशपुरे पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. पहिल्याच बायकोशी दुसऱ्यांदा भारत लग्न करतो आहे. ऐकुन सगळ्यांनाच आश्चर्य वाटणारी ही गोष्ट असली तरी त्यामागील कहाणीही तितकीच रंजक आहे. भारतचं लग्न होऊन १८ वर्षं झाली आहेत. आता १८ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा लग्न करत आहे. आता तो कोणाशी लग्न करत आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर असे की, तो त्याच्या पत्नीसोबतच पुन्हा लग्न करत आहे.
भारतने त्याच्या पत्नीसमवेत पुन्हा लग्न करण्यामागे एक खास कारण आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची टीम काही दिवसांपूर्वी वर्ल्ड टूरवर गेली होती. त्यावेळी भारतला सौम्य अटॅक आला होता. भारतचा ज्योतिष शास्त्रावर खूप विश्वास आहे. त्यामुळे त्याने भारतात आल्यावर लगेचच ज्योतिषींची भेट घेतली होती. त्यावर ज्योतिषींनीच त्याला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच आज भारत पुन्हा एकदा पत्नीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भारतसोबत काम करणाऱ्या श्रेया बुगडेने भारत गणेशपुरे पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची गोष्ट इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितली आहे. श्रेयाने भारत आणि त्याच्या पत्नीच्या हळदी समारंभातील एक फोटो सोशल नेटवर्किंगला पोस्ट करून भारत दादा आणि वहिनीची हळद अशी त्याला कॅप्शन दिलं आहे.