बॉलिवूड स्टार रणबीर कपूर त्याच्या चित्रपटांमुळे कमी अन् अफेअर्समुळेच अधिक चर्चेत असतो. लव्ह अफेअरच्या बाबतीत रणबीरला तोड नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळेच तर आत्तापर्यंत अर्ध्या डझन मुलींसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. सध्या आलिया भट्टसोबत रणबीरचे नाव जोडले जात आहे. अर्थात ही केवळ अफवा असल्याचे रणबीरने म्हटले आहे. पण त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवणार कोण? होय, खुद्द रणबीरचे वडिल ऋषी कपूर हेही रणबीरच्या अफेअरच्या चर्चांमुळे वैतागले आहेत. अलीकडे एका इव्हेंटमध्ये तरी हेच दिसले.
आजच्या अभिनेत्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता, असा प्रश्न या इव्हेंटमध्ये ऋषी कपूर यांना विचारण्यात आला. यावर ऋषी कपूर यांनी आपल्या नेहमीच्या चिरपरिचित अंदाजात उत्तर दिले. ‘ माझा सल्ला कुणालाच यशाच्या मार्गावर नेऊ शकणार नाही,’ असे ते म्हणाले. या प्रश्नानंतर तुम्ही रणबीरला काय सांगू इच्छिता? असा दुसरा प्रश्न त्यांना केला गेला. यावर ऋषी कपूर यांनी रणबीरला काही सांगण्याऐवजी त्याला एक जाहीर सवालचं करून टाकला. ‘आखिर तुम कब शादी करोगे?’ असा खोचक प्रश्न त्यांनी रणबीरला विचारून टाकला. एकंदर काय तर रणबीर कधी लग्न करणार, हा प्रश्न केवळ ऋषी कपूर यांनाच नाही तर त्याच्या सर्वच चाहत्यांना पडला आहे.
रणबीरचे नाव अनेकींशी जुळले आहे. आधी दीपिका पादुकोणसोबत रणबीर रिलेशनशिपमध्ये होता. मग त्याच्या आयुष्यात कॅटरिना कैफ आली. पण कॅट व रणबीरचेही ब्रेकअप झाले. त्यापूर्वी अवंतिका मलिकसोबतही रणबीरच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अवंतिकाने आमिर खानचा भाचा इमरान खानसोबत लग्न केले. केवळ अवंतिका नाही तर सोनम कपूर आणि अगदी अलीकडे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबतही रणबीरचे नाव जुळलेय.