सिंधुदुर्ग – ओखी वादळाचा महाराष्ट्राला तडाखा बसण्यास सुरुवात झाली असून मालवण समुद्रात पोलिसांची गस्ती नौका बुडाली आहे. मात्र यात जीवितहानी झाली नसून दोन पोलीस सुखरूप समुद्रातून बाहेर आले आहेत. तर रायगडमध्ये उरणच्या माणकेश्वर समुद्र किनारी नांगरण्यात आलेल्या सहा मासेमारी बोटींना जलासमाधी मिळाली आहे.
आज सकाळपासून पुन्हा समुद्र खवळला असून त्याचा फटका पोलिसांच्या गस्ती नौकेला बसला.सिंधू ५ ही नौका मालवण समुद्रात उलटली असून नौकेला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मालवण तालुक्यातील देवबाग, मालवण, आचरा, तोंडवळी यासह संपूर्ण किनारपट्टीवर ओखी वाडळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मोठ्यामोठ्या लाठा किणाऱ्यावर धडकत आहेत.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर ओखी वादळाचा चांगलाच फटका बसल्याच दिसून येत आहे. रायगड किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात समुद्री व्यवस्था डळमळीत झाली आहे. उरणच्या माणकेश्वर समुद्र किनारी नांगरण्यात आलेल्या सहा मासेमारी बोटींना जलासमाधी मिळाली आहे. यामधील तीन बोटी बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले असून, तीन बोटींचा शोध सुरू आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४८ तासात कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. तर समुद्र अजूनही खवळलेला असून मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाचा परिणाम राहणार आहे. त्यानंतर स्तिथी सामान्य होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.