अकोला – माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दहशतवाद्यांविरोधात लढण्याकरता जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइक‘ केले होते. त्याच धर्तीवर शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारशी लढण्याकरिता शेतकर्यांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ आजपासून केला जाईल, असे त्यांनी रणशिंग फुंकले. शेतकरी जागर मंचाच्या आयोजित कापूस-सोयाबीन-धान (कासोधा) परिषदेत ते आज बोलत होते.
शेतकरी जागर मंचच्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना यशवंत सिन्हा यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा खरपूस समाचार घेतला. सरकारविररुद्ध मोठा संघर्ष उभा केल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असेही ते ठामपणे म्हणाले.
निवडणुकीत मोठी आश्वासने देऊन सत्ता मिळविणार्यांनी आता शेतकर्यांच्या समस्यांकडे पुरती पाठ फिरविली आहे. निवडणुकीपूर्वी शेतकर्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले आहे. फसवणूक झाल्याची शेतकर्यांना जाणीव झाली आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. याचा सरकारला आरसा दाखविण्याचे काम अकोल्यातून केले जाईल, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नोटाबंदीचे नुकसान भरून निघेल का?
नोटाबंदी प्रयोग यशस्वी झाल्याचे व देशाचा जीडीपी उंचावल्याचा सांगितले जात आहे. परंतु, या काळात झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानीचे काय? ते नुकसान भरून निघेल का? असा सवाल सिन्हा यांनी यावेळी उपस्थित केला.
नाफेडचे उफराटे धोरण
सरकारची यंत्रणा असलेल्या नाफेडचे शेतकरीविरोधी धोरणे असून, त्यांच्याद्वारे शेतकर्यांची अडवणूक केली जात आहे. शेतकर्यांचा संपूर्ण शेतमाल हमीभावात खरेदी करण्याची नाफेडची तयारी नाही. यासाठी मर्यादा घालून दिल्या जात असल्याने योग्य दर मिळत नसल्याने शेतमाल विकायचा कुठे? असाही सिन्हा यांनी प्रश्न उपस्थित केला.
यावेळी कार्यक्रमाला शेतकरी नेते, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, गजानन अहमदाबादकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, दत्ता पवार उपस्थित होते. तसेच यावेळी शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.