मुंबई :या सरकारने सुरुवातीपासूनच दुष्काळाबाबतचे योग्य नियोजन केले नाही… पाण्याचा टँकरची व्यवस्था केली नाही… चारा छावण्या उभ्या करायच्या की चारा डेपो उभा करायचा हेच ठरवण्यात सरकारचा वेळ गेला. चारा छावण्या उभ्या केल्या तिथे ही आपले कार्यकर्ते कोण हे बघितले आणि त्यांनाच मदत केली असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.
२९३ अन्वये राज्यातील भीषण दुष्काळ प्रश्नावर बोलताना अजितदादा पवार यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले.
आज हवा तसा पाऊस झाला नाही त्यामुळे हिरवा चारा येईपर्यंत सरकारने चारा छावण्या बंद करू नये. पशुधन वाचवण्यासाठी १२० रुपये प्रति जनावर द्यावे अशी मागणीही अजितदादा पवार यांनी केली.
पिकविम्याबाबत शेतकऱ्यांना मोठी अडचण आहे. शेतकरी आज पिकविम्या कंपन्यांपासून वंचित राहत आहे. विमा कंपन्यांचा मोठा फायदा झाला मात्र शेतकरी विम्यापासून वंचित राहिला असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.
तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना २ हेक्टरी २० हजार रुपये देत आहेत. मग शेतकर्यांना महाराष्ट्र सरकार ६ हजारच का देत आहे. तुम्ही केंद्राला सांगा कमी पडले तर राज्य सरकारकडून मदत करा मात्र शेतकऱ्यांना मदत करा कारण जगाचा पोशिंदा जगला पाहिजे असेही आवाहन अजितदादा पवार यांनी सरकारला केले.
२०१४ साली जलयुक्त शिवार योजना आणली. जनतेला स्वप्न दाखवले. ५ हजार गावे प्रत्येक वर्षी दुष्काळ मुक्त करू असे मुख्यमंत्री म्हणाले होते मग आज दुष्काळ का आहे ? असा सवाल अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
सरकार जनतेला फक्त गाजरं दाखवत आहे. जसा ऊसाला एफआरपी ठरला आहे तसा इतर पिकांनाही खात्रीलायक दर मिळायला हवा. शेतकऱ्यांना आम्ही समृद्ध करणार..शेतकऱ्यांना ५ हजार पेन्शन देऊ…शेतकऱ्यांना मोफत बी – बियाणे देवू असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते मात्र सरकारने त्यांचेच पद काढून घेतले असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला.