पावसामुळे पुणे आणि नाशिकमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 17 नागरिकांचा शेकडो जनावरांचा बळी गेला आहे. मात्र, मुख्यमंत्री एवढे मस्तवाल झाले आहेत की त्यांना भाजप आणि निवडणूका या व्यतिरिक्त काही दिसत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.
पुणे आणि नाशिकच्या परिस्थितीवरून मलिक यांनी पत्रकार परिषदेत सरकारचा समाचार घेतला. आज मुख्यमंत्र्यासह पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील इतर नेते दिल्लीत उमेदवारांच्या नावाची चर्चा करत आहेत. महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे आणि नाशिक येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील पूरपरिस्थिती असेल किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रसंग असेल; सगळ्या वेळी आपत्ती व्यवस्थापन निद्रिस्तावस्थेत होते. ही परिस्थिती हाताळण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आणि पालकमंत्री यांचे आहे. पण हे लोक मात्र दिल्लीत जावून बसले आहेत”, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसचीही सरकारवर टीका
“सरकारला पूरपरिस्थितीचे गांभीर्य नाही. फडणवीस सरकारला लोकांच्या प्रश्नांशी काहीच देणंघेणं नाही. पुण्यामध्ये पूरात माणसं मरत असताना भाजपाचे मंत्री मात्र निवडणुकीसंदर्भातील कामांमध्ये अडकेलेले आहेत. कोल्हापूर-सांगलीत पूर आला तेव्हा मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढण्यात व्यस्त होते आणि आज पुण्यामध्ये पूर आलेला असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्राकांत पाटील हे युतीच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत,” अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.