देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुंबई, दिल्लीतल्या मशींदीमध्ये नमाजपठणासाठी मुस्लीम बांधवांनी मोठी गर्दी केली आहे.कोल्हापूर-सांगली परिसरात मात्र बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. पूरस्थितीमुळे ईदवर केला जाणारा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.आजच्या दिवशी मुस्लीम बांधव बोकडाचे बळी देऊन आणि मोठी दावत ठेऊन हा ‘कुर्बाणी सण’ मोठ्या जल्लोषात साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता यंदाच्या कुर्बाणीत काटकसर करून या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा नेक निर्णय मुंबईतल्या अनेक मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. दरम्यान जम्मू काश्मीरला विशेष दर्जा आणि अधिकार देणारं कलम 370 हटवल्या नंतर जम्मू काश्मीरमध्येही आज बकरी ईद साजरी केली जाणार आहे.
एका बोकडाची किंमत 15 ते 20 हजारांच्या घरात असते. त्याची कुर्बाणी देऊन मोठ्या दावती ठेवल्या जातात. यावर लाखोंचा खर्च केला जातो. मात्र त्याऐवजी काटकसर करुन आम्ही एका पूरग्रस्त कुटुंबियाची जरी मदत करु शकलो तर खऱ्या अर्थाने आम्ही मानवतेच्या धर्माचं पालन करु, अशी भावना अनेक मुस्लीम बांधवांनी व्यक्त केली.