यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निकालाआधीच नेत्यांना मंत्रिपदाची खैरात वाटप सुरु केली आहे. मंत्रिमंडळताली तिसरा मंत्री ठरवला आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना तर माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांना मंत्री बनवणार असल्याचं जाहीर केल होतं.
यवतमाळच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी निलय नाईक यांना मंत्री करण्याची ग्वाही दिली. महत्त्वाचं म्हणजे निलय नाईक यांची लढत त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार इंद्रनील नाईक यांच्याशी होत आहे. हे दोघेही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भाजपची प्रचारसभा यवतमाळमध्ये झाली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “जर तुम्ही निलयभाऊंना विधानसभेत पाठवलं तर माझा शब्द आहे की मी निलय भाऊला मंत्री बनविणार. विधानपरिषदेच्या सदस्याला मंत्री करण्याबाबत मोदीजींनी नियम बनविले आहे, त्यामुळे निलयभाऊंना विधानसभेत पाठवा. जाताना निलय भाऊ आमदार म्हणून जातील येताना मंत्री म्हणून येतील असे सांगितले.