नागपूर : शिवसेना सावरकरांना मानते, दुसरीकडे, काँग्रेस सावरकरांचा अपमान करणारं वक्तव्य करते. मात्र, शिवसेना काही करु शकत नाही. शिवसेनेला ही हतबलता, दुर्बलता जी आली आहे त्याचं कारण म्हणजे शिवसेनेला काँग्रेसमुळे सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आज त्यांना त्यांचे विचार सोडावे लागले आहेत. अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
नितीन गडकरी म्हणाले, हे सरकार आपल्या बोजाने डुबल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. हे तिन्ही पक्ष आमच्या विरोधात एकवटले आहेत, याचाच अर्थ आम्ही सामर्थ्यवान आहोत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली. “हे तिन्ही पक्ष आमच्या विरोधात एकवटले आहेत, याचाच अर्थ आम्ही सक्षम आहोत, सामर्थ्यवान आहोत. आम्हाला काहीही अडचण नाही, आम्ही लढायला तयार आहोत. परंतू या तीनही पक्षांच्या विचारात ताळमेळ नाही. अशीही टीका नितीन गडकरी यांनी केली.
शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे म्हणाले होते की, बांग्लादेशी नागरिकांना मुंबईतून बाहेर काढा. मात्र, आता शिवसेना नागरिक्त सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून हिंदुत्व, मराठी माणूस हे सगळे विचार शिवसेने सोडून दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी माणूस, हिंदुत्व प्रेमी जनता शिवसेनेवर नाराज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या विचारात ताळमेळ नाही.”
CAA बाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी….
“केंद्रात पारित करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी भाजप सरकारने CAA आणि NRC जागरुकता अभियानाला सुरुवात केली आहे. CAA आणि NRC यावरुन वोट बँकचं राजकारण करण्यासाठी मुस्लीम समाजात भीती निर्माण केली जात आहे. मात्र, हा कायदा कुठल्याही समाजाच्या अथवा धर्माच्या विरोधात नाही. देशातील मुस्लीम समाजाविरोधात नाही. ते आमच्या कुटुंबातील एक अविभाज्या घटक आहेत, हेच सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे”, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.