‘आतापर्यंत पालखीचे भोई बनून होतो. आता तसं बनून राहणार नाही. मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार. महाराष्ट्रात आपलंच सरकार बनणार’,अशी रोखठोक भूमिका शिवसेनेचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हॉटेल द रिट्रिटमध्ये शिवसेना आमदारांच्या बैठकीत मांडली.
शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून, शिवसेना आता भाजप सोबत जाणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेना आमदार हॉटेल द रिट्रीट येथे असलेल्या पक्षाच्या आमदारांबरोबर त्यांची सध्या चर्चा सुरू आहे. तर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे शनिवारी सायंकाळपासून आमदारांबरोबरच असून ते देखील आमदारांचे मत जाणून घेत होते. त्यामुळे सत्ता स्थापनेच्यादृष्टीने आता उद्धव ठाकरे आमदारांशी नेमकी काय चर्चा करणार? चर्चेनंतर कोणता निर्णय घेणार? याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली आहे. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा असं बैठकीत सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सरकार सत्तास्थापन करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.