मुंबई: आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणाऱ्या श्रीदेवी यांना २०१३ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील महान व्यक्तींच्या पार्थिवावर तिरंगा लपेटला जातो. त्याचप्रमाणे श्रीदेवी यांच्या पार्थिवावर ‘तिरंगा’ चढवण्यात आला. तसेच पोलिसांकडून त्यांना मानवंदना देखील देण्यात आली.
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा अखेरचा प्रवास सुरु झाला आहे. शेवटच्या क्षणीसुद्धा श्रीदेवी यांच्या सौंदर्याची चर्चा आहे. रुपेरी पडद्यावर वावरताना श्रीदेवी यांनी नेहमीच आपल्या सौदर्याची काळजी घेतली. चित्रपटांपासून दूर असतानाही त्या जेव्हा कधी कॅमेऱ्यासमोर आल्या तेव्हा त्यांच्या सौंदर्याची चर्चा व्हायची. आजच्या अंतिम प्रवासातही वधूप्रमाणे श्रीदेवी यांचे पार्थिव सजवण्यात आले आहे.
त्यांना लाल रंगाची बनारसी साडी नेसवण्यात आली आहे. तसेच त्यांच्या भांगात कुंकू भरण्यात आले आहे, त्यांचा मेकअप करण्यात आला आहे. लाल रंगाची लिपस्टिकही लावण्यात आली आहे. या सगळ्यामुळे त्या खूपच सुंदर दिसत आहेत. श्रीदेवी यांच्या या अंतिम क्षणी देखील त्या तितक्याच सुंदर दिसत आहेत. श्रीदेवी यांना पांढरा रंग प्रचंड आवडायचा. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटात पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांच्या अंतिम क्षणी त्यांना पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवावे असे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यामुळे त्यांचे पार्थिव पांढऱ्या मोगरा आणि गुलाबाच्या फुलांनी सजवले गेले आहे.
मंगळवारी रात्री बोनी कपूर व अर्जुन कपूरसह इतर कुटुंबीय श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन आले. अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने त्यांचे पार्थिव मुंबईत आणले गेले. मंगळवारी रात्री एअरपोर्टवर स्वतः अनिल अंबानी, जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर एअरपोर्टवर उपस्थित होते. श्रीदेवी यांची आज दुपारी सव्वा दोन वाजता अंतीम यात्रा काढण्यात आली. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
पार्थिवावरील तिरंगा…
देशासाठी प्राण देणार्या शहीद जवानांच्या आणि देशातील महान व्यक्तींच्या पार्थिवावर तिरंगा लपेटला जातो. यावेळी केसरी पट्टी ही डोक्याकडे आणि हिरवी पट्टी ही पायांकडे ठेवली जाते. मृतदेहासोबत तिरंग्याला दहन किंवा दफन न करता नंतर तो गोपनीय पध्दतीने सन्मानपूर्वक जाळला जातो किंवा त्याला जलसमाधी दिली जाते. फाटलेल्या, रंग गेलेल्या तिरंग्यालाही याच पध्दतीने विसर्जित केले जाते.