सांगली : राज्यात व केंद्रात आता पतंप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचा जनाधार प्रचंड घसरला आहे. भाजपला जनाधार विकत घ्यावा लागतो. ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना विकतच घेतात. तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकात पाटील हे पैशाचा पाऊसच पाडतात. भाजपचे हे पैशाचे राजकारण फार काळ टिकणार नाही. अशी टीका शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी सांगली येथील पत्रकार बैठकीत केली.
किर्तीकर म्हणाले, भाजपची घसरण सुरू असतानाच. शिवसेनेचा मात्र जनधार वाढला आहे. राज्यामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत शिवसेना स्वबळावर लढणार आहे. यामध्ये शिवसेनेला मोठे यश मिळेल. सांगली, हातकणंगले, कोल्हापूर आणि सातारा या लोकसभा मतदार संघात शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा करणार आहे. खासदार राजू शेट्टी यांनी भाजपला जरी अंगावर घेतले असले तरी ते आता कॉंग्रेसच्या जवळ गेले आहेत. ते राहूल गांधी, सोनिया गांधी यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. त्यामुळे यांच्याही विरोधात शिवसेना उमेदवार उभा करेल. आणि सर्व शक्तीनिशी निवडणूक लढवू. असेही किर्तीकर यावेळी म्हणाले.