दिल्ली : शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपासोबतचा घरोबा तोडल्यामुळे भाजपची सत्ता हातातून गेली. यामुळे शिवसेना खासदारांच्या राज्यसभेतील आसनव्यवस्थेत बदल करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत नाराज झाले आहेत. संजय राऊत यांनी सभापती वैंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं असून भाजपा प्रणित एनडीएवर जोरदार टीका केली आहे.
आसनव्यवस्थेत बदल करत आपल्याला पाचव्या रांगेत स्थान देण्यात आल्यावरुन नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी भाजपाकडून माझा आणि शिवसेनेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे.
वैंकय्या नायडू यांना पत्रात लिहिलं आहे की, “मला वाटतं शिवसेनेच्या भावना जाणुनबुजून हा निर्णय कोणाकडून तरी घेण्यात आला आहे. तसंच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे”. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “मला आठवण करुन द्यायची आहे की, जेव्हा एनडीए विरोधात होतं तेव्हाही माझी ज्येष्ठता पाहता राज्यसभेत तिसऱ्या रांगेतच स्थान देण्यात आलं होतं. पण आता माझा आणि पक्षाचा अपमान करण्यासाठी जाणुनबुजून पाचव्या रांगेत स्थान देण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे”.
जागा बदलण्याचं नेमकं काय कारण आहे याचं उत्तर आपल्याला अद्यापही समजेलेलं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपल्याला तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात यावं अशी मागणी केली आहे. सभापतींनी कोणताही भेदभाव न करता निर्णय घेतले पाहिजेत असंही संजय राऊत यांनी पत्रात लिहिलं आहे.