मुंबई l केंद्रातील मोदी सरकारने या शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला आहे. शेतकऱ्यांवर बळाचा वापर करायला ते काय अतिरेकी आहेत का? शेतकऱ्यांपेक्षा चीनवर बळाचा वापर केला असता तर चिनी सैन्य लडाखमध्ये घुसलं नसतं, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. त्यांना हरियाणाच्या सीमेवर अडवून त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी या शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणेच पंजाब-हरियाणातील शेतकरी या देशाचे पोशिंदे आहेत. त्यांच्याकडून हरियाणाच्या सीमेवर आंदोलन करताना काही घडलं असेल तर त्यांच्यावर बळाचा वापर करण्याची गरज नाही.
बळाचा वापर करायला ते काय अतिरेकी आहेत का? त्यांनी अत्यंत शांततापूर्ण आंदोलन करून देशालाच नव्हे तर जगाला आदर्श दाखवून दिला आहे, असं सांगतानाच चीनच्या सीमेवर बळाचा वापर केला असता तर चीनंच सैन्य लडाखमध्ये घुसलं नसतं, अशी टीका त्यांनी केली.
वाचा l भाजपच्या माजी मंत्र्याची पोलीस अधिका-यांना धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल
कॉमेडियन अभिनेते कपिल शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कपिलच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे. सत्तेत नसताना शेतकऱ्यांवरील अत्याचार खपवून घेणार नाही, अशी तुमची भाषा होती.
आता ती भाषा कुठे गेली? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आला आज त्यांच्यावरच बळाचा वापर करता? हे काय चाललंय?, असा सवालही त्यांनी केला.
राजकीय दुश्मनाला जेरीस आणण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जातो. या संस्थांना आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर पाठवा, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे नेते होते. त्यांनी बार्डोलीचा सत्याग्रह केला होता. आज शेतकऱ्यांवर होत असलेला बळाचा वापर पाहून पटेलांची मूर्तीची रडत असेल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.