मुंबई : मुंबई, पुणे, ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये कांदा महागला आहे. किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. यामुळे सर्वसामान्यांची पंचाईत झाली आहे.
कांदा खराब होण्याच्या भीतीनं गेल्या वर्षीच अनेक शेतकऱ्यांनी कांदा विकून टाकला, त्यामुळे आताच्या हंगामात कांद्याची साठवण शिल्लक नाही. जो कांदा होता तो ही परतीच्या पावसामुळे साठवण केलेल्या चाळीत पाणी शिरल्याने कांदा सडला. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे. शेतातला कांदा काढणीला येताच पावसानं हजेरी लावली त्यामुळे कांदा काढणी लांबणीवर पडली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातला लाल कांदाही खराब होण्याची भीती आहे.
कांद्याचा तुटवडा होऊ नये म्हणून परदेशातून कांदा आयात करण्यात आला. आयात कांदा वातावरणात टिकला नाही म्हणून त्याला उठाव नाही. डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.