अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुर्णपणे बोजवारा उडाला. शिवसैनिकांचे हत्याकांड ही घटना गंभीर आहे. सर्व प्रकरण संघटीतपणे केलेले आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलीसांनी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.
पर्यावरणमंत्री कदम यांनी मृतांच्या कुटुबियांना भेट दिल्यानंतर शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, डीवायएसपी अक्षय शिंदे, कोतवालीचे निरीक्षक अभय परमार यांच्या संगनमताने हे हत्याकांड झाले आहे. त्यामुळे प्रथम या दोन्ही पोलीस अधिका-यांची हकालपट्टी करावी. केडगावातील दहशतीबाबत पोलीसांना कल्पना देऊन त्यांनी गांभीर्यान घेतले नाही. पोलीसांच्या संगणमताने हे प्रकरण घडले आहे. शिवसेना कुठल्याही परिस्थितीत या गुन्हेगारांना मोकळे सोडणार नाही. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून त्यांच्याकडे योग्य ती मागणी करणार आहे. कर्डिले, कोतकर आणि जगताप हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. केडगावची पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसने एकत्र येत सेनेला शह दिला. भाजपाने नावाला उमेदवार उभा केला. भाजपाने नावापुरता उमेदवार उभा केला. हे सर्व प्रकरण संघटितपणे केले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.