मुंबई : भाजपमध्ये अंतर्गत वाद वाढला असून, गटबाजीला उधाण आले आहे. नाराज नेते भाजपातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. याला आता अधिकृतपणे दुजोरा मिळाला आहे. भाजपचे अनेक बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशी माहिती माजी मंत्री राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी केलं होतं. देवेंद्र फडणवीसह, केंद्रीय रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह बड्या नेत्यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार पाच वर्ष टीकणार नाही असा दावा केला आहे. दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप नेते प्रचार करत आहेत, पण महाराष्ट्रातच यांची बोट बुडणार, अशी टीका नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवलेल्या नेत्यांनाही पक्ष बदलायचा आहे. ज्यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी आयुष्य खर्ची काढलं, त्यांच्यावरही अन्याय झाला. त्यामुळे तेही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत, असं म्हणत नवाब मलिक यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. त्यामुळे भाजपचे बडे नेते हे भाजपला रामराम करणार हे जवळपास निश्चित आहेत.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ते उत्सुक आहेत. एका आठवड्यात मोठे फेरबदल पाहायला मिळतील, असा दावा मलिक यांनी केला. लोकांचा भाजपवरील विश्वास उडाला आहे. लवकरच सगळ्यांना समजेल की भाजपची लाट आता ओसरली आहे, त्यांना आताच सावध होणं गरजेचं आहे, असं नवाब मलिक म्हणाले.