मतमोजणी केंद्रांवर स्टाँगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र, मोबाईल जॅमर बसवणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे.
ईव्हिएम मशीनमध्ये गरबड करता येते असा विरोधकांचा, काही सामाजिक संघटनांचा आरोप होता. त्यामुळे त्यांनी ईव्हिएमच्या विरोधात भूमिका घेतली होती. ईव्हिएम मशीन या फुलप्रुफ आहेत. तसंच या मशीन्सना बाह्य यंत्रणांद्वारे हाताळता येऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँगरूममध्ये मोबाईल जॅमर बसवण्याच्या प्रश्नच उद्भवत नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी स्पष्ट केलं.
व्हिव्हिपॅट आणि ईव्हिएम मशीन्सबाबत सर्व ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले आहेत. तसंच त्यांचा इंटरनेटशी, वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जॅमर लावण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.
काय होती मागणी…
ईव्हिएम आणि व्हिव्हिपॅटमशीन हॅक होण्याचा धोका असल्याने मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंत राज्यातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. आता निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देत जॅमर बसवण्यात येणार नसल्याचं सांगितलं. यामुळे विरोधकांना पुन्हा धक्का बसला आहे.