शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार, महापौर केलं जातं. तानाजी सावंत यांना पैसे घेऊन मंत्रीपद दिलं आहे. सावंत यांनी किती पैसे दिलेत हे जगजाहीर झालं आहे. असा खळबळजनक आरोप राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी केला.
पुण्यातील इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये नारायण राणे बोलत होते. राणे यांनी यापूर्वीही शिवसेनेवर आरोप केले आहेत. आता राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असून त्यापूर्वीच त्यांनी शिवसेनेला डिवचले. राणे आणि शिवसेना हा संघर्ष जुना असला तरी शिवसेना सध्या तरी भाजपाचा मित्र पक्ष आहे.
आमदार, मंत्रीपदं पैसे घेऊन दिली जात असल्याने शिवसेना कमजोर झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून शिवसेनेला शेळी किंवा मांजर म्हटलं तरी हरकत नाही, शिवसेनेत वाघ राहिले नसून शेळ्या-मेंढ्या झाल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.
माझ्या भाजप प्रवेशाला शिवसेनाच आडकाठी करत आहे. मला भाजपनं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून बोलवल्यानंतर मी गेलो. या सर्वांनी माझ्या नेतृत्वात काम केलं आहे. मी भाजपात जाणार हे नक्की, असल्याचं ही राणेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे सोडले तर सर्व राजकीय पक्षात माझे चांगले संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं.
मला मंत्रीपदही मिळणार होतं, शपथ घ्यायचा दिवस ठरला होता. मात्र शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला. त्यानंतर मला मंत्रीपद देण्याचा निर्णय बारगळल्याचा आरोप राणे यांनी केला.