मुंबई : कोरोनाचा धुमाकूळ वाढला असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता आर्थर रोड कारागृहातून ४०० कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
आर्थर रोड कारागृहाची क्षमता ८०५ कैदी सामावण्याची आहे. मात्र, सध्या तिथे ३,४०० कैदी होते. यापैकी ४०० कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. तसेच, विविध गुन्हे प्रकरणातील सुनावणीसाठी कैद्यांना पुढचे काही दिवस न्यायालयात नेलं जाणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला नाही. तर, अत्यावश्यक सुनवाणी प्रकरणं ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होतील.
आर्थर रोड कारागृहात दोन बराक आयसोलेशन वॉर्डसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कैद्यांना निसर्गोपचारही देण्यात येणार आहे. आर्थर रोडप्रमाणे ठाणे, कल्याण मधील जादा कैदी तळोजा कारागृहात हलवणार असल्याची माहिती आहे. तळोजा कारागृहाची क्षमता जास्त आणि कैद्यांची संख्या इतर कारागृहांच्या तुलनेने कमी असल्याने त्या कारागृहात कैद्यांना हलवण्यात येत आहेत.