औरंगाबाद : राज्यात सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबाद येथील बेगमपुरा येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल झाली आहे.
हिंदुत्वाचे रक्षण करण्याकरीता आणि हिरवा गाडण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन औरंगाबाद येथील प्रचार सभेत उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केले होते. पण निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी आमची फसवणूक करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे. आमची फसवणूक केली अशी तक्रार पेशाने वकील असलेल्या रत्नाकर चौरे यांनी केली आहे. याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
काय आहे तक्रारीत…
विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी आणि माझ्या कुटुंबाने महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान केले. निवडणुकीचे निकाल पाहता जैस्वाल यांना भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांची मते पडली. निवडणुकीनंतर शिवसेनेची भाजपशी साथ सोडून सरकार स्थापन केले नाही. त्यामुळे हिंदुत्व रक्षणाकरिता दिलेले माझे मत वाया गेले. हिंदुत्वाच्या नावाखाली माझी फसवणूक झाली असल्याचे चौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी आमदार प्रदीप जैस्वाल, उद्धव ठाकरे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती पोलिसांना केली आहे.