औरंगाबाद : महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर औरंगाबाद महापालिकेत भाजपने शिवसेनेची आज शुक्रवारी साथ सोडली. भाजपच्या महापालिका निवडणुकीला अवघे पाच महिने शिल्लक असतांना भाजपच्या उपमहापौरांन पदाचा राजीनामा दिला. यामुळे शिवसेनेची महापालिकेतील सत्ता धोक्यात आली आहे.
औरंगाबादेत आज शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. भाजपचे विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. विजय औताडे यांच्यासह भाजपचे सर्व 22 नगरसेवकांनी एकत्र राजीनामा देण्याची निर्णय घेतला आहे. सेना-भाजप नगरसेवक गोंधळ आता नवीन वळणावर पोहोचला आहे.
भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले की, सर्व नगरसेवक लवकरच राजीनामा देणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून याची कुणकुण सगळ्यांना लागली होती. अखेर शुक्रवारी सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडला. जवळपास 27 वर्षे एकत्र नांदलेल्या भाजप-सेनेच्या नगरसेवकांनी आता काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत विजय औताडे यांनी नेहमीप्रमाणे महापौरांच्या खुर्चीजवळ न जाता नगरसेवकांमध्ये जाणे पसंत केले. त्यानंतर औताडे यांनी राजीनाम्याची घोषणा करत खळबळ उडवून दिली. औरंगाबाद महापालिका निवडणुकीला अवघे चार महिने बाकी असताना भाजपने हा पवित्रा घेतला आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, हा ठराव भाजपच्या पचनी पडला नाही. त्यामुळे विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याचे शिवसेनेने आरोप केला आहे.