मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ने नोटीस बजावल्यापासून मोदी सरकार आणि भाजपा विरोधात शिवसेनेने टीकेचा सूर लावला आहे. मागील दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसत असताना ‘सामना’च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं.
त्यानंतर, भाजपा नेत्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर जोरदार टीका केली. भाजपाचे आशिष शेलार, केशव उपाध्ये, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांच्यानंतर राम कदम यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत ‘सामना’मध्ये लिहित होते तोपर्यंत ते एक वर्तमानपत्र होतं.
आता मात्र ते केवळ एका पक्षाची जाहिरात करण्यासाठी सुरू असलेलं हॅण्डबिल आहे.‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला”, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांचा समाचार घेतला. “नोटीशीला घाबरायचं काय कारण? कर नाही त्याला डर कशाला? आणि जर काही कारणाने घाबरले असाल तर याचा अर्थ नक्कीच काही तरी गौडबंगाल आहे. कुठेतरी पाणी मुरतंय हे समजायला महाराष्ट्राची जनता निश्चितपणे हुशार आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.