ठाणे – ठाणे शहरातील नालेसफाईचा पुरता बोर्या वाजला आहे. थोड्याशा पावसातही ठाणे शहरातील अनेक नागरी वस्त्या जलमय होत आहेत. त्यामुळे साथीच्या रोगांचाही प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यातूनच एका मुलीचाही डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्या निषेधार्थ ठामपा प्रशासनाला जाग आणण्यासाठी ठाणे काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेस चे प्रदेश सचिव आशीष गिरी यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन करण्यात आले यावेळी ठाणे युवक काँग्रेसचे पदाधिकारी ऋषिकेश तायडे,गोविंदा परदेशी,निलेश दास,संदीप तायडे,अमित डाकी,सोन्या वाघमारेउपस्थित होते.
ठाणे शहरातील नालेसाफाईचे तीन तेरा वाजले आहेत. पावसाळ्यामध्ये गाळ रस्त्यावर साचत असल्याने दरवर्षी साथीचे आजार बळावत असतात. मागील वर्षीही या साथीच्या रोगांमुळेच अनेकांचा बळी गेला होता. मात्र, आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एका 13 वर्षीय मुलीचा डेंग्यूने बळी गेला आहे. या बळीस ठामपा प्रशासनाच जबाबदार आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने वर्तक नगर प्रभाग समितीसमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी, लहान मुलांना साथीच्या रोगापासून वाचविता येत नसेल तर किमान बाहुलीला तरी वाचवा, असे म्हणत निवेदनासोबत प्रतिकात्मक बाहुलीही प्रशासनाला दिली.
यावेळी गिरी यांनी सांगितले की, सत्ताधारी शिवसेना आणि ठामपा प्रशासनाला खोटे बोल पण रेटून बोल, अशी सवयच लागली आहे. काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे ठाणे पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. या पावसाने नाल्यातील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरली. वर्तकनगर, नौपाडा आणि मुंब्रा प्रभाग समितीच्या अंतर्गत असलेल्या अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. त्यातूनच रोगराई वाढीस लागली असून डेंग्युने बळी गेलेल्या मुलीच्या मृत्यूस पालिका प्रशासन आणि ठकेदारच जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.