सिंधुदुर्ग: भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोकणात येऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच ललकारले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना शिवसेनेने तिलांजली दिली आहे. बाळसाहेबांचे विचार तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी सत्तेत आली आहे, अशी घणाघाती टीका अमित शाह यांनी केली.
अमित शाह यांच्या हस्ते भाजप नेते नारायण राणे यांच्या रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अमित शाह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांना ललकारले. तसेच आम्ही मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचंही शाह यांनी तब्बल दीड वर्षानंतर जाहीरपणे स्पष्ट केलं. या शिवाय राज्यातील ठाकरे सरकार हे लालची सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली
शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली.
कमरा पॉलिटिक्स करत नाही
आम्ही कुणालाही कसलंही आश्वासन दिलं नव्हतं. आम्ही वचन दिलं हे सफेद झूठ आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेदरम्यान मी काही आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं. मी कधीच बंद कमऱ्याचं पॉलिटिक्स करत नाही.
जे आहे ते सडेतोड बोलतो. ठोकून बोलतो. उघड बोलतो. मी तु्म्हाला कधीच कोणतं आश्वासन दिलं नव्हतं. आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांना वचन दिलं आणि ते पाळलंही, असंही ते म्हणाले.
तेव्हा तुम्ही त्याला आक्षेप का घेतला नाही
उद्धवजी, आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं म्हणता, मग निवडणुकीतील प्रत्येक भाषणात आम्ही राज्यातील एनडीएच्या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसच करणार असल्याचं आम्ही सांगायचो.
तेव्हा विरोध का केला नाही. तुमच्या समोरच मी आणि मोदींनीही फडणवीसच राज्याचं नेतृत्व करतील असं अनेकदा सांगितलं. तेव्हा तुम्ही त्याला आक्षेप का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला.
तीन पायांची ऑटो रिक्षा
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवरही शहा यांनी पहिल्यांदाच टीका केली. तीन पायाच्या ऑटो रिक्षासारखं हे सरकार आहे. या रिक्षाला चौथं चाक नाही. पण तिन्ही चाकं तिन्ही दिशेने जात आहे.
त्याचं कारण म्हणजे पवित्र जनादेश नाकारून हे सरकार सत्तेत आलं आहे. जनतेने सरकार बनविण्यासाठी भाजप-शिवसेनेनेला जनादेश दिला होता. पण सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने हा जनादेश नाकारला, अशी टीका शहा यांनी केली.
राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी
कोकणात वादळ आलं. मुख्यमंत्री या भागात किती वेळा आले. एकदाही नाही. पण देवेंद्र फडणवीस तीन वेळा आले. त्यांच्याकडून मी वादळाची माहिती घेत होतो. त्यांनी काजूच्या बागांनाही भेटी दिल्या.
आमची जनतेशी बांधिलकी आहे. पण या सरकारची ती राहिली नाही. हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 75 टक्के मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यात तीन पक्षाची आघाडी असूनही हा कौल मिळाला आहे. त्यावरून जनता कुणाच्या पाठी आहे हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.