कोल्हापूर: महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा गैरवापर करत अमाप संपत्ती मिळवली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयातर्फे चौकशी करण्यात यावी अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनी परस्पर विकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राजेश क्षीरसागर म्हणाले, “चंद्रकांतदादा पाटील यांची २०१४ मध्ये आमदार होते त्यावेळची संपत्ती आणि सध्याची संपत्ती यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याची प्रमुख उदाहरणं म्हणजे गणेशोत्सव, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांची केलेली खरेदी आहे.
चंद्रकांतदादांची टेलिमॅटीक कंपनी २०१४ पर्यंत पूर्णत: नुकसानीत किंवा कमी प्रमाणात फायद्यात होती. आता त्यांनी कोट्यवधी कमावले आहेत. या कंपनीची काही गुंतवणूक त्यांनी परदेशात केली. त्यामुळे याबाबतची चौकशी होणं गरजेचं आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यांनी अनेक सहकाऱ्यांच्या नावे पैसे ठेवले आहेत. त्यांनी मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. या सर्वाची चौकशी ईडीने करावी”