मुंबई : देशभर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ( NRC ), नागरिकत्व दुरुस्ती कायदा ( CAA) विरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. अनेक ठिकाणी हिंसक वळणही लागले. एनआरसी केवळ मुस्लिमच नाही तर हिंदूंसह सर्वधर्मीय भरडले जातील असं शिवसेना पक्ष प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशातील कोणालाही बाहेर काढण्याचा कायदा नाही. अमित शहांनी म्हटलंय की, हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. तेवढ्यापुरतं मी मानतो. आपल्या शेजारील देशांतील पीडितांना इथे नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे. इथून कुणालाही बाहेर घालवण्याचा कायदा नाही. आणखी एक गोष्ट आहे, ज्याची चर्चा होणार नाही, किंबहुना होत नाहीय, ती आहे एनआरसी. एनआरसी केवळ मुसलमानांना त्रासदायक आहे, असं नाही. मुळात एनआरसी येणार नाही. किंबहुना आम्ही तो येऊच देणार नाही. एनआरसी अमलात आणण्याचं जर भाजपने ठरवलं तर केवळ मुसलमानांनाच त्रास होणार नाही, तर तुम्हा-आम्हाला आणि देशातल्या हिंदूंना तसेच सर्व धर्मांना त्रास होणार आहे. म्हणजे तिथे त्याबाबतीत तरी सर्वधर्म समभाव येणार आहे.
एनआरसी हिंदूंच्या सुद्धा मुळावर येणार…
एनआरसी केवळ मुसलमानांना त्रासदायक आहे, असं नाही. मुळात एनआरसी येणार नाही. किंबहुना आम्ही तो येऊच देणार नाही. हिंदू-मुसलमान भेद तिकडे येणार नाही. एनआरसी हिंदूंच्या सुद्धा मुळावर येणार आहे. आसाममध्ये १९ लाख लोकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करता आलेलं नाही. म्हणून याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आणि या १९ लाखांत १४ लाख हे हिंदू आहेत. तिथल्या आमदार, खासदारांचे म्हणजेच लोकप्रतिनिधींचे ते कुटुंबीय आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.