औरंगाबाद : भीमा-कोरेगाव घटनेनंतर राज्यभरात निर्माण झालेला जातीय तणाव, हिंसक घटना या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा कायम राहावा यासाठी सोमवारी शहरातून शिवराय ते भीमराय सद्भावना मुक रॅली काढण्यात आली. क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत मराठा, दलित, डावे यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
दुपारी एक वाजेच्या सुमारास निघालेली ही रॅली भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी विविध मागण्यांच्या निवेदनाचे महिलांनी सामूहिक वाचन केले. यात प्रामुख्याने कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीसांकडून करण्यात आलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, तरुण, महिला, वयोवृद्धांना मारहाण करून जखमी करणाऱ्या पोलीसांवर गुन्हे दाखल करावे, महाराष्ट्र बंदच्या काळात दलित तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे. आष्टी येथे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला तीस लाखांची मदत करावी आदी मागण्यांचा समावेश होता. संभाजी ब्रिगेड, बळीराजा संघटना, राष्ट्रीय मराठा महासंघ, स्वाभिमानी अखिल भारतीय छावा, शिवक्रांती संघटना, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, अखिल भारतीय छावा, मराठा सेवा संघ, दलित अत्याचार विरोधी समिती, रिपाई गवई गट, बुलंद छावा, फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन, एआयएसएफ, एसएफआय, डीवायएफआय, लाल निशाण, वेल्फेअर पार्टी, जमात ए इस्लामी, अखिल भारतीय जिवा संघटना, तंजीम ए इंसाफ, जनता दल सेक्युलर, एसआयओ, समता विद्यार्थी आघाडी, मूळ निवासी संघ, बामसेफ, भीम आर्मी, महात्मा फुले युवा दल, सी टू, स्वराज इंडिया आदींसह परिवर्तनवादी संघटनांचा रॅलीत सहभाग होता.