मुंबई : ‘तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या मग आम्हीही औकातीप्रमाणे २०० कोटींचे दावे ठोकू‘ असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिला होता. त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी सपेशल माघार घेत जामिनाची रक्कम १ कोटी वरून कमी करत सरसकट १ लाख केली आहे.
फेरीवाल्यांच्या आंदोलनादरम्यान ठाणे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी जाधव यांना १ कोटी आणि इतरांना २५ लाखाच्या जामिनासाठी नोटीस बजावली होती. मनसेचा मात्र जामिनाची रक्कम भरण्यास नकार दिला आहे. शनिवारी झालेल्या ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना याबद्दल खडेबोल सुनावले होते. “आमच्या कार्यकर्त्यांवर १ कोटींचे दावे ठोकतात मग पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर का नाही दावे ठोकत असा सवाल केला होता. तसंच तुमच्यावर खटले दाखल झाले तर आम्हीही २०० कोटींचे दावे ठोकू असा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता.
ठाणे पोलिसांनी आज कोर्टात या दंडात मोठी कपात केली. जाधव यांच्यावरील १ कोटींचा दंड आणि २५ कार्यकर्त्यांवरील प्रत्येकी २५ लाखांचा दंड १ लाखांवर करण्यात आलाय.
पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची गुन्ह्यांची यादीही दिली, पण हे गुन्हे राजकीय स्वरुपाचे असल्याचा मनसेचा दावा आहे. तसंच आम्ही सराईत गुन्हेगार नसल्यानं आम्हाला ही नोटीस लागू होत नसल्याचा असा मनसेचा युक्तीवाद आहे.
मनसेला पोलिसांच्या नोटीसला आव्हान देऊन युक्तीवाद करायचा आहे. कोर्टाने दोन आठवड्यांनंतर पुन्हा सुनावणी ठेवली आहे, तोपर्यंत जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यास तसंच नोटीसीची रक्कम भरण्यास दोन आठवड्यांची कोर्टाची स्थगिती दिली आहे.
दरम्यान, जामिनाची १ कोटी आणि २५ लाखांची रक्कम जास्त असल्याचं मनसेतर्फे ठाणे पोलिसांना पत्र लिहिण्यात आलं होतं, त्या पत्राच्या विनंतीनुसार आम्ही रक्कम कमी केली असल्याची ठाणे पोलिसांनी हायकोर्टाला माहिती दिली.