वंचित बहुजन आघाडी आणि मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमिन (एमआयएम) या दोन्ही पक्षांतील युतीला अलीकडे तडे गेले होते. खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी तातडीने एक गोपनीय पत्र पाठवून युती अभेद्य ठेवली. सोमवारी दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा करणार आहेत. मात्र एमआयएमला समाधानकारक जागा मिळाल्या नाही तर एमआयएम वंचितमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला एमआयएमसोबत युती करून काहीच फायदा झाला नाही. उलट एमआयएमला एका जागा मिळाली, अशी काहींची भावना झाली. मुस्लिम बांधवांनी औरंगाबाद वगळता राज्यात कुठेच वंचितच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले नाही. लोकसभेच्या निकालानंतर दोन्ही पक्षांतील दरी वाढली. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाची तयारी सुरू केली.
एमआयएमकडून औरंगाबादच्या तिनही मतदारसंघांवर दावा करण्यात आला. त्यामुळे आंबेडकर लवकरच जागांची घोषणा करण्याची चर्चा होती. त्याची कुणकुण खासदार ओवेसी यांना लागली. त्यांनी बंद लिफाफ्यात एक पत्र विशेष दूतामार्फत मागील आठवड्यात पाठविले. त्यामुळे युती अजून अभेद्य आहे. २६ ऑगस्टला आंबेडकर व ओवेसी राज्यातील २८८ जागांवर चर्चा करतील. गेल्या विधानसभेत एमआयएमने ज्या जागा लढविल्या होत्या, त्या जागा कायम राहतील. या शिवाय आणखी काही महत्त्वपूर्ण मुस्लिमबहुल मतदारसंघांवर एमआयएमने दावा केला आहे. यावर प्रामुख्याने चर्चा होईल. अकोला विधानसभा मतदारसंघ एमआयएमला हवा आहे. प्रकाश आंबेडकर हा मतदारसंघ सोडतील का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
शुक्रवारी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह औरंगाबादेतील माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांना हैदराबादेत बोलाविले होते. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत त्यात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मुस्लिम समाजालाही वंचितमध्ये मानाचे स्थान देण्याचे काम आंबेडकर यांनी काही दिवसांपासून सुरू केले आहे. औरंगाबादेतील राष्ट्रवादीच्या तीन माजी नगरसेवकांना त्यांनी गेल्या आठवड्यात प्रवेश दिला. त्यामुळे भविष्यात एमआयएम पक्ष सोबत नसला तरी वंचितला फारसा फरक पडू नये, अशी व्यूव्हरचना आखण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र आज काय फैसला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.