Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपरीक्षा प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल कुलगुरु व सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन - उदय...

परीक्षा प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल कुलगुरु व सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन – उदय सामंत

मुंबई: राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाईन आणि अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. या सर्व परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असून काही परिक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी दिली.

            मंत्रालयात श्री.सामंत यांनी सर्व कुलगुरुंसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेवून परीक्षा आणि निकालाचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री.सामंत यांनी ही माहिती दिली. परीक्षा प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांनी संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, कोविड-19 मुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देवू शकले नाहीत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिवाळीनंतर 15 दिवासामध्ये घेण्यासाठी संबंधित विद्यापीठाने नियोजन करावे, तसेच जे विद्यार्थी यावर्षी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा एक महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. कोविडचे संकट असतानासुद्धा सर्व विद्यापीठांनी यशस्वीपणे परीक्षा प्रक्रिया राबविल्याबद्दल सर्व कुलगुरु आणि परिक्षेशी संबंधित असलेले सर्व कर्मचारी यांचे श्री.सामंत यांनी अभिनंदन केले.

            काही विद्यापीठांनी निकाल जाहीर झालेल्या विषयांच्या प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली. मागच्या वर्षाप्रमाणेच ह्या गुणपत्रिका आहेत तसेच पदवी समारंभामध्येसुद्धा मागील वर्षाप्रमाणेच पदवी देण्यात येणार आहे.

            विद्यापीठाने ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करुन परीक्षा यशस्वीपणे घेतल्या. एकाही विद्यार्थ्यांला कोविडची बाधा होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली आहे. तसेच ज्या विद्यापीठांमध्ये परीक्षेसंदर्भात तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्यासंदर्भात सत्यशोधन समिती गठीत केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

            विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरुंसोबत बैठक घेवून त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठकीत चर्चा करण्यात येईल. राज्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेवून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

            या सर्व परीक्षांचा अहवाल राज्यपाल यांच्याकडे पाठविण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments